Saturday, June 13, 2020

■शुध्दी क्रिया (षट् कर्म) ■ कै. दादासाहेब टिचकुले ऑनलाइन योग वर्ग


शुध्दी क्रिया (षट् कर्म)
गृहिणी आपले घर रोज स्वच्छ करते.  जमा झालेला कचरा बाहेर टाकते. ते घर २४ तास प्रसन्न राहते. सुशिक्षित मानव आपल्या शरीरातील जमा झालेला कचरा बाहेर टाकत नसल्यामुळे त्याला रोग होतात. ‌ शरीर व मन हे अंतर्बाह्य शुद्धीकरणासाठी योगामध्ये ६ प्रकारच्या शुध्दी क्रिया सांगितल्या आहेत. म्हणून त्यास षट् क्रिया म्हणतात. आरोग्य साठी या षट् कर्माचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
“सर्वे रोग: प्रजायन्ते जायन्ते मल संचयात्” |
आयुर्वेदाचा आधार वात-पित्त-कफ हाच आहे.
आयुर्वेदाचे दोन सूत्र 
  1. स्वास्थस्य सर्वार्थ रक्षणम् |  रोग आयुष्यभर होऊ नये. 
  2. आतुरस्य विकार रोग झाल्यास तो निवारण करून निसर्गासह जीवेम शरदः शतम् आयुष्य जगण्यासाठी सहकार्य करणे.
             योगशास्त्राचे हेच उद्दिष्ट असते. आपले शरीर वात, पित्त व कफाने बनलेल्या आहे. या तीन अनावश्यक दोष आरोग्याचे दृष्टीने प्रमाणबद्ध म्हणजेच, समान करणे हा महत्त्वाचा मार्ग आहे, त्यामुळे आपले शरीरात सप्त रस तयार होतात आणि जो अनुपयुक्त ‘मळा’चा भाग बाहेर फेकला जावयास हवा तो तसाच शिल्लक YHराहिल्यास, त्याचे इतर अंगावर परिणाम होतात. आपल्या शरीरातील डॉ. आपणास वेळोवेळी सूचना देत असतो. त्याकडे लक्ष न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ लागतात‌. मग आपण औषधे, इंजेक्शन व अँटिबायोटिक्स (Antibiotics) घेत असतो. अँटिबायोटिक्स चे परिणामाने मुत्रपिंड, हृदय आणि लाल रक्तपेशी सुद्धा मरतात. आजच्या युगातील व्यक्तींना झटपट आराम हवा असतो. वनस्पतीजन्य आणि खनिज औषधाने चांगला परिणाम होतो.  ऍलोपॅथी ने रोगाला दाबण्याचा प्रयत्न होतो. पुढे त्याच रोगाचे स्वरूप पूर्वीपेक्षा उग्र  होते.
विजातीय (वात-पित्त-कफादी) औषधाशिवाय बाहेर काढण्याचा एकच उपाय आहे. तो म्हणजे  षट् कर्माचा (अभ्यास) मार्ग होय. ह्यामुळे विजातीय तत्व बाहेर फेकल्या जातात. त्यामुळे अन्ननलिका, श्वसन नलिका,
 नाड्या तंत्र मलरहीत होऊन शरीर निर्मळ बनते.
‘धौतिर्बस्तिस्तथा नेतिस्त्रटकं नौलिकं तथा ||
कपालभातिश्चैतानि षट्कर्माणि प्रचक्षते' || ||२-२२||
  1. धौति
    1. बाह्य शुद्धी 
      1. स्नान
      2. किरण स्नान
      3. मालिश
    2. अंतर शुद्धी 
      1. जल धौति
      2. वस्त्र धौती
  2. नेति 
    1. सुत्र नेती 
    2. रबर नेति
  3. कपालभाति 
    1. आध्यात्मिक
    2. शारीरिक
  4. नौली 
    1. मध्य नौली
    2.  वाम नौली
    3. दक्षिण नौली
  5. बस्ती 
    1. बास जलबस्ती
    2. महा बस्ती
    3. वायु बस्ती
  6. त्राटक 
    1. आंतर त्राटक
    2. मध्यम त्राटक 
      1. बिंदू त्राटक
      2. ज्योती त्राटक
    3. बाह्य त्राटक
शुद्धिक्रिया तर ६ आहेत. परंतु त्याच्या सोबत शुद्धी कर्म आणि शोधन कर्म सुद्धा सांगितलेले आहेत. हेही शुद्धि क्रियांचे भाग आहेत. 

नेत्र स्नान:-  

सुप्रभाती उठल्यानंतर आपण, एक सुभाषित, दोन्ही हाताच्या तळव्याचे दर्शन घेऊन, तसेच दोन्ही हाताचे घर्षण करून, तोंडावरून हात फिरवून ही प्रार्थना म्हणतो. 
‘कराग्रे वसते लक्ष्मी|  करमध्ये सरस्वती ||
करमुलेश्च गोविंदा | प्रभाते कर दर्शनम्' ||
त्यानंतर अंथरून सोडावे. ताबडतोब  हंड्यातील अथवा नळाचे पाणि  तोंडात मावेल तितके, गाल फुगवून, डोळे उघडे ठेवून, एका हाताचे ओंजळीने वारंवार दुसऱ्या पाण्याने डोळ्यावर हबके मारावेत, जीव घाबरा झाल्यास तोंडातील पाणी टाकुन देउन परत तोंडात पाणी भरा व वरीलप्रमाणे डोळ्यावर २०-२० हक्के तीन टप्प्याने मारा. या कृतीला नेत्र स्नान असे म्हणतात. नेत्र स्नान सकाळी झोपेतून उठल्यावर, रात्री झोपायच्या आधी उन्हातून आल्यानंतर आणि मुले जेव्हा अभ्यासाला बसतात त्यापूर्वी, करावयाचे आहे. यामुळे डोक्यातील उष्णता कमी होऊन डोके शांत व थंड होते.  डोळ्याची जळजळ, उष्णता कमी होते. आळस जाऊन उत्साह निर्माण होतो. डयोळ्याचे गरमीचे विकार नष्ट होतात‌‌. मुलांनी अभ्यासापूर्वी हे केल्यास मन एकाग्र होते. रात्री झोप शांत लागते‌. दृष्टी स्वच्छ होते‌‌. यानंतर शौच विधी वगैरे आटपून पुढील प्रमाणे जलधौतिची क्रिया करावी.

जलधौति:-
जलधौतिचे मुख्य दोन प्रकार आहेत. १) बाह्य शुद्धी (Outer Cleaning) आणि २) अंतर शुद्धी (Internal Cleaning) या बाह्य शुद्धीत किरण स्नान (Sun Bath) आणि मालिश यांचा समावेश होतो

स्नान (Bath)
आपल्या शरीरावर असंख्य रध्रै आहेत. शरीरात निर्माण होणारा मळ घामाच्या रुपाने या रंध्रातून बाहेर पडतो. निसर्गाने या शरीरात एक अशी यंत्रणा सुस्थापित केली आहे. ज्यामुळे मल-मूत्र आणि घामाच्या रूपात विजातीय सतत बाहेर फेकले जाते. स्नानाचा उद्देश त्वचा व त्यावरील छिद्रे स्वच्छ करणे होय. आजकाल स्नानाला तरी कुठे वेळ आहे? जरी केले तरी झटपट उरकावे लागते. त्यामुळे फक्त त्याच्या त्वचा थोडीफार स्वच्छ होते. पण त्यावरील छिद्रे मळाने भरलेलीच असतात. असाच क्रम सतत चालू असतो. कालांतराने त्वचेवरील छिद्रे बंद पडल्यामुळे अशुद्धी वाढते व चामडीच्या विकारापासून अनेक विकार उद्भवूण्याचा संभव असतो. करीता कधितरी सवडीत  मधून मधून शरीराला अंघोळी आधी १५ मिनिटे तेलाने रगडल्यास शरीर गरम होते व त्वचे वरील छिद्रातील मळ सुटतो व नंतर गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा मलरहित होते. तेलाचा मसाज खालून वर उलट्या दिशेने केला पाहिजे. तेलाचा मसाज आठवड्यात एक दिवस केला तरी चालेल व त्याच दिवसापुरता गरम पाण्याचाही उपयोग केला तरी चालेल. इतर वेळी स्नान थंड पाण्याने करणे आवश्यक आहे. थंड पाण्याने स्नान करताना प्रथम पायाची बोटे, पायाचा वरचा भाग, घोटा, पोटरी, गुडघा, मांड्या, कंबर, पोट, छाती, गळा, मान, चेहरा आणि नंतर डोके अशाप्रकारे खालून क्रम ठेवल्यास आपण हिवाळ्यात सुद्धा थंड पाण्याने आंघोळ केल्यास आपल्याला काहीही बाधा होत नाही. आपलं शरीर गरम होत जाते, उलट दिशेने अंघोळ केल्यास शहारे  येऊ लागतात. प्रात: स्नान कांती आणि उत्साहवर्धक असते. रक्तदोष पित्तदोषाचे निर्मूलन होऊन इंद्रिये शांत व प्रसन्न होतात.

किरण स्नान (Sun Bath)

भारत देशात ३५०-३५५ दिवस सूर्यप्रकाश अस्तित्वात असतो. खनिजे- कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम इ. सूर्यप्रकाशा शिवाय त्याचे शरीरात शोषण होऊ शकत नाही. थंड कटिबंधात राहणारे  किरण स्नानाचे (Sun Bath) महत्त्व जाणतात. भारता सारख्या उष्ण कटिबंधाताचे देशातही त्यांचे महत्त्व काही कमी नाही. 
‘आरोग्यं भास्कराविच्छेत्'| 
आरोग्य देणारा आणि अनारोग्य घालविणारा सूर्य १ महान चैतन्यशक्ती आहे. त्याच्या कोमल किरणांमध्ये सकाळी ८-१० वाजे पर्यंत २ तास उघड्या शरीराने पडून राहिल्यास आरोग्य वृद्धी होते. जगातील नामांकित डॉ रक्तशय पीडित रोग्यांना किरण स्नानाची खास शिफारीश करीत असतात. शहरी जीवनात ते शक्य नसल्याने त्यांना खेड्यात जाऊन ते करण्याचा सल्ला देतात. सूर्यकिरणांनी रक्त शुद्ध होऊन रक्ताभिसरण उत्तम प्रकारे होते व कडकडून भूक लागते. वैज्ञानिक दृष्टीने हाडांची मजबुती सूर्य प्रकाशावर अवलंबून आहे. सूर्यकिरणांनी शरीरात प्रक्रिया सुरू होऊन “ड” जीवन सत्व (Vit-D) तयार होते. त्याचा परिणाम मुडदूसचा (Rickets) विकार दूर होऊन आरोग्य लाभते.

मालिश

बाह्य शुद्धीच्या इतर इलाजा बरोबरच मालिशचा इलाज फारच लाभदायक ठरला आहे.
शुकेषु मे हरीमाणं रोपणाकासु दध्मसि | अथो हारीद्रवेषु हे हरीमाणं निदध्मसि || (सौर सूक्त १२)
वय वाढल्यानंतर स्नायू कठीण आणि कमजोर बनतात, त्वचा वाळते. तेलाचे मालिश केल्यास ते लवचिक व कार्यक्षम बनतात. रंध्रात लपलेले (साचलेले) अशुद्ध मलरूपाने बाहेर निघून जाते. परिणामतया त्वचा मऊ होते. अनियमित रक्ताभिसरण नियमित होऊन रक्ताचे अभिसरण वाढते.
‘अभ्यंगमाचरे नित्यं स जरा श्रम वातहा: | दृष्टी  प्रसाद पुष्ट्यायु: स्वप्नसुत्वकत्व दार्ढ्यकत्||||वाग्भट सूत्र||
नियमितपणे शरिराचे तेलाने मालिश केल्याने वृद्धावस्था लवकर लाभत नाही. त्याने वातविकार नाहीसे होऊन थकवा दूर होतो.  रक्ताभिसरण उत्तम चालते, शरीर पुष्ट होते, नजर तेज होते, शरीर स्वस्थ होऊन सुखाची झोप लागते. मनुष्य दीर्घायुषी होतो.

तेल मालिशचा प्रभाव
बाळंतपणानंतर मातेचा व बाळाचाही काही दिवसांपर्यंत तेलाचा मसाज करावा लागतो. हा मसाज त्याचे शरीरातील उष्णता वाढण्याचे काम करतो. स्त्रीचा थकवा दूर होऊन बाळाची कांती वाढते. रक्ताभिसरण चांगले होते. आजकाल इलेक्ट्रिकल मसाजचाही उपयोग केला जातो, परंतु तो एक सुष्क (Dry) (कोरडा) असा उपचार आहे. तेल मालिश शरीरातील नसनाड्या आणि अवयव मजबूत व लवचिक बनून खांद्याचे दुखणे दूर होते. आपणास कल्पना असेल की महात्माजी नेहमी तेलाचे मालिश करून घ्यायचे. त्यांचा परिणाम ते ७८ वर्षाचे वयातही ८-१० मैल  सहज न थकता चालू शकत होते. त्यांना रक्तदाब (Blood Pressure) चा त्रास  होता. तेलाच्या नियमित मालिशने त्यांनी तो विकार काबूत ठेवला होता. तेल मालिश हा एक स्वस्त व हितकारक असा इलाज आहे. अर्थातच हे सर्वांना शक्य नसले तरी अनेकांसाठी तो इलाज फायदेशीरच आहे.
‘शुष्कनापि काष्टानि  स्नेहस्नेदोष-पादनै:| नमयंति यथा न्यायं किं पुनर्जीवितोनरान्'||
सुकलेले लाकूड किंवा बांबूची काठी यांना तेलात थोडे भिजवून नंतर त्याला शेक दिला गेला तर ते नरम व मजबूत बनतात. त्याचप्रमाणे आपली हाडे मालिशने मजबूत व चिवट होतात. मृत जनावरांच्या कातड्याला तेल दिले जाते. त्याची मशागत केली जाते व नंतर तीच कातडी दुर्गंधरहित व चमकदार होते. लहान-मोठ्या यंत्रात तेल सोडूनच ती कार्यक्षम ठेवावी  जातात.
वरील प्रमाणे मालिश चे महत्त्व असाधारण आहे. तसा आमचा अनुभवही आहे. तापाच्या अवस्थेत मालिश करणे अहितकारक आहे. मालिश  एक प्रकारचे घर्षण आहे. त्याने शरीरात विद्युत निर्माण होते‌. अशुद्ध रक्‍त शुद्ध झाल्यानंतर लाल रक्तपेशी वाढत असतात व प्रतिकारशक्ती वाढून रोगाचे निवारण होते. शरीरामध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची भरपूर वृद्धी होते. डुबळ्या  प्रकृतीच्या व्यक्तिमध्ये ते अगदी कमी असतात. ते वरीलप्रमाणे वाढविल्यास आरोग्यरक्षण होते. स्नान, मालिश हे  बाह्य शुद्धीत येत असल्याने संक्षिप्त माहिती याठिकाणी दिली गेली आहे. आता अंतर्शुध्दीचे प्रकाराकडे आपण वळू. 
अंतर शुद्धी चे २ प्रमुख प्रकार आहेत. जलधौति व वस्त्रधौति.

1. जलधौति

अं:तधौति वरील प्रमाणे २ प्रकाराने केली जाते. वास्तविक जो जलधौति करतो. त्याने वस्त्र धोती केलीच पाहिजे असे  नाही. अभ्यासाच्या दृष्टीने करावयास हरकत नाही. परंतु अनावश्यक वात-पित्त-कफ घालविण्यासाठी फक्त जलधौतिचा उपयोग सुद्धा पूर्ण फलप्रद होतो. जलधौति म्हणजे पोटात पाणी घेऊन वमनाद्वारे बाहेर काढणे व वस्त्रधौति म्हणजे पोटात कपडा गिळून बाहेर काढणे. वस्त्रधौतिचा उपयोग क्वचित प्रसंगीच करावयाचा असतो. 
नेत्र स्नानापासून आपण शुद्धीक्रिया सुरुवात करीत असतो. कोणतेही शुद्धीकरण प्रात:कालीन केलेले अधिक चांगले असते.
     सुरुवातीचे काही दिवस २ मोठे ग्लास कोमट पाणी घेऊन त्यात जरूर भासल्यास मीठ घालून ते पाणी प्यावे व लगेच उजव्या हाताच्या मधल्या ३ बोटांनी मोठ्या जिभेवर पडजीभेपर्यंत घर्षन करावे. प्यायलेले पाणी वमन करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. प्रथम सर्व पाणी बाहेर पडणार नाही. परंतु सवयीने २-४ दिवस प्यायलेले पाणी बाहेर पडताना ते पाणी कफ-पीतमिश्रित असल्याचा अनुभव येईल. सुरुवातीस थोडे पाणी पोटात राहून गेल्यास ते सौचा व लघवीद्वारे निघून जाईल. (जर आपणास लगेच बाहेर जावयाचे असल्यास काही पार्ले-बिस्कीट  किंवा कुरमुरे खाल्ल्यास त्या पाण्याचे शोषण होऊन आपणास बाहेर गेल्यानंतर सौच अथवा लघवीचा त्रास होणार नाही.) पाणी पडू लागल्यानंतर दर दिवशी थोडे थोडे पाणी वाढवून ८-१० ग्लास पाणी पिण्याची मजल गाठावी. सर्व पाणी बाहेर पडू लागेल. सवयी नंतर मीठ घालण्याची जरुरी नाही. तसेच सवय चांगली झाल्यानंतर प्रत्येक दिवशी जलदौती करण्याची जरुरी नाही. नंतर प्रसंगोपात तिचा उपयोग करावा. पुढे पुढे थंड पाणी घटाघटा पिऊन बिनास्पर्श बाहेर उलटी करून फेकून देता येते. सदरची क्रिया ओणवे होऊन अगर बसून करावी. बाहेर पडणार्‍या पाण्याबरोबर कधीकधी आपल्याला न पचलेले अन्न, आम्लपित्त, कडूपित्त, कफ आदी विजातीय बाहेर पडताना दिसेल. अभ्यासानंतर ही क्रिया करण्यास फक्त ५ मिनिटे पुरे आहेत‌. कोठा व अन्ननलिका साफ केली जातात. ‘त्रिदोष’ समान होऊन शरीर हलके होते. अपचनाचे रोग घालविले जावून. मेद कमी केला जातो‌. 
(सूचना:- शरीर क्षीण, जीर्ण ज्वर, घशात अगर छातीत काही विकार असल्यास जलधौति करू नये.) मेद वाढलेल्या व कफाने पछाडलेल्या व्यक्तीनेही धौती केलीस पाहिजे. ज्यांना संधिवात आहे म्हणजे गुडघेदुखी, सांधेदुखी असल्यास त्यांना जलधौतिचा खूप फायदा होतो. असे अनेक कल्पनातीत लाभ होतात.
विशेष सूचना:- जलधौति  करतांना जोर लावू नये. सहज पाणी बाहेर काढता येईल तेवढे काढावे. हाताच्या बोटाची नखे कापली नसल्यास टाळू ला लागून रक्त येऊ शकते. जोर लावल्यास कदाचित रक्ताचे थेंब पाण्याबरोबर आढळतात. तसे झाल्यास साधकाने घाबरू नये पुन्हा केव्हातरी प्रसंगानुसार केल्यास चालेल. पोटातील पाणी बाहेर काढता येत नसल्यास, अगर भीती वाटत असल्यास, पाणी पोटात राहिल्यास हरकत नाही. शौचा व लघवीवाटे ते निघून जाईल. त्याचाही चांगला परिणाम म्हणजे सौच संबंधी विकार ठीक होऊ लागतील.

जलनेती
जलनेती चे दोन प्रकार आहेत.१) जलनेती व २) सूत्रनेती. जलनेती म्हणजे नाकाने पाणी पिण्याची क्रिया. सूत्र नेती म्हणजे नाकात सुत धाग्याने बनवलेले सूत्र घालून, अगर रबरी कॅथेटर घालून नाक साफ करण्याची क्रिया. यात सूत्र नेतिचा उपयोग सर्वांनी केलाच पाहिजे असे नाही. अभ्यास आणि नाकाचे विशेष दोष घालविण्या साठी करावे.
   सर्वसाधारणपणे आरोग्यासाठी जल नेतिचा चांगलाच उपयोग होतो. प्रथम दिलेल्या जलधौतिचा  थोडा अभ्यास झाल्यानंतर, त्याची हळूहळू सवय करावी. जलनेती करावयास बसतानाच  एका वाटीत कोमट पाणी घेऊन, जरूर असल्यास त्यात थोडे मीठ घालून, वाटी दोन्ही नासिका पाण्यात बुडतील अशी धरावी. वाटीतील पाणी एकदम वर न ओढता जसे वरील तोंडाने पाणी पितो, त्याप्रमाणे ते नाकाने प्यावयाचे आहे अशी नुसती कल्पना करून सावकाशपणे पाणी वर ओढावे. सवयीने थोडे पाणी घशात आल्याचा अनुभव येईल. दुसरा एक प्रकार चिनीमातीचे किटली सारखे तोटी असलेले लहान भांडे घ्यावे. व 

वरीलप्रयाणे मीठ मिश्रित पाणी त्यात भरावे. भांड्याची तोटी एका नासिकेत घालून मान खाली तिरपी वाकवून इटलीतील पाणी नाकात सोडावे. तोंड उघडले  ठेवले म्हणजे ते पाणी दु स-या नासिकतून बाहेर पडेल. त्याचप्रमाणे दुसऱ्या नासिकेतुन तशी सवय करावी.
वरील प्राथमिक प्रयोग करताना २ दिवस थोडा त्रास सहन केला म्हणजे ८ दिवसात वाटीतील घेतलेले पाणी सहज दोन्ही नासिकेने  पिता येते. नासिकेने  ओढलेले पाणी तोंडातून बाहेर टाका अगर पोटात गेल्यास हरकत नाही. पोटात गेलेले पाणी जलधौतिने बाहेर काढता येईल. सवयी नंतर गरम पाणी घेण्याची अगर त्यात मीठ घालण्याची आवश्यकता नाही. दिवसात केव्हाही वाटल्यास १ ग्लास थंड पाणी नाकाने पिणे चांगले. चहा-कॉफी अगर थंडपेय पिऊन सुस्ती घालविण्यापेक्षा वरील प्रयोग अति उत्तम व आरोग्यप्रद आहे. त्याचे लाभ ही अप्रतिम आहे.
लाभ:-
नेती केल्याने सर्दी पडशाचे विकार नाहीसे  होऊन कपाळाची शुद्धी होते. अनेक वर्षांची डोकेदुखी थांबते, दिव्यदृष्टी लाभते. सायनस सारखे विकारात प्रसंगानुसार रोगाचे स्वरूप पाहून 'सूत्रनेति' चा ही उपयोग करता येतो. ज्यास नाकाने पाणी पिण्याची सवय झाली आहे, त्यास सुत्रनेति सहज करता येते. नाकातील मांसल भागात असलेली सूज वगैरे नाहीसे होऊन श्वसनलिकाची शुद्धी होते व नंतर कपालभाती चे विशेष कर्म करणे  सोपे जाते. जलनेतीचे रात्री जागरण करणाऱ्या, निद्रानाश असलेल्या व डोक्यात उष्णता वाढलेल्या व्यक्तींनी अवस्था अवश्य करावी. अनेक वर्षाची डोकेदुखी, अर्धशिशी वगैरे रोग नाश पावतात.

सूत्र नेति


थोडी कल्पना यावी या दृष्टीने सूत्र नेति देत आहे. अर्थातच या क्रिया  प्रत्यक्ष समजून घेणे फार महत्त्वाचे असते. सूत्रनेति १२ इंच लांबीचा सुताच्या ८-१० धाग्यांना एकत्र करून, त्याची दोरी बनवून त्या सूत्रनेतिस अगर रबराच्या कॅथेटरला एका बाजूने तूप किंवा मेंण लावून या नासिकेत घालून हळूहळू गळ्याच्या पडजिभेपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. नंतर एक टोक हातात धरून, दुसऱ्या हाताची तर्जनी व अंगुष्ट तोंडात घालून घशातुन थोडा हवेचा जोर द्यावा व आतील दुसऱ्या टोकाला पकडावे. दोन्ही हातांनी पकडलेल्या सूत्रनेतिने मागे पुढे हळूहळू घर्षन करावे. त्याचप्रमाणे दुसऱ्या नासिकेनेही करावे. नेतिकर्माचे लाभ वरील प्रमाणे.
(सूचना:- डोळे, नाक, कान व मस्तक यांच्यात काही त्रासदायक रोग असल्यास नेति करू नये.

नौली कर्म:- 
(दक्षता नौली कर्म करण्यापूर्वी ३ बंध- मुलबंध, उडियान बंध व जालंदर बंध तसेच अग्निसार आणि उड्डियान या क्रिया केल्या नंतरच याचा अभ्यास करावा.)
अग्निसार म्हणजे पोटाला श्वास रहित अवस्थेत हबके भरण्याची क्रिया.( या क्रियेला मुग्ध भस्त्रिकाही  म्हणतात.) या क्रियेने पोटाची चांगली मशागत होऊन ‘उड्डियानाची’ क्रिया साध्य झाली. आता या उड्डियानाचा अभ्यास करीत करीत पोटाचे  मध्यातील दोन्ही नळ वर उचलण्याचा प्रयत्न करावयाचा आहे‌ यावेळी बसून किंवा ओणवे उभे राहून ही क्रिया करावी. अभ्यासाने पोटातील मध्य नळ वर येतील. त्या क्रियेला मध्यनौली असे म्हणतात‌.  त्यानंतर गुडघ्यावर ठेवलेल्या दोन्ही हातांचा क्रमश: दाब हलका केला म्हणजे डावीकडील नळ स्पष्टपणे काढता येतील. याला वामनौली  किंवा दक्षिणनौली असे म्हणतात.
‘अमदावर्तवेगेन तुंदं सव्याप्त सव्यत||
 नतांसो भ्रामयेदेषा नौली: सिद्धै प्रचक्षते' ||||मठ.२/३३||
खांदे पुढे वाकवून बाहेर काढलेल्या नळांना, पाण्याला जसा भोवरा पडतो त्याप्रमाणे उजवीकडून डावीकडे व डावीकडून उजवीकडे चक्राप्रमाणे नौली फिरवायच्या कृतीला श्लोकात नौली म्हटले आहे‌. नौली चक्र फिरविण्याचा चांगला अभ्यास झाल्यानंतर रिकामे पोट असेल त्यावेळी अर्धा ग्लास कोमट पाणी त्यात थोडे मीठ व थोडे लिंबू पिळून ते पाणी पिऊन टाकावे व नंतर उभे राहून वरील प्रमाणे ‘चक्रावर्तन’ नौली करावी. एखाद्या काचेच्या बाटलीतील पाणी घालून ती स्वच्छ करण्याकरीता जशी क्रिया केली जाते त्याप्रमाणे पोटातील मळाची सफाई होते. जिज्ञासूंनी त्याप्रमाणे अनुभव घ्यावयाचा हरकत नाही.
लाभ:- पोटाचे कठीणत्व, वात, पित्तादी विकार संग्रहणी, अग्निमांद्यता, बद्धकोष्ठता आदी विकार नाश पावतात. प्राणवाहिनी नाडी ‘सुषुम्ना” चा मार्ग खुला होण्यास मदत होते. पोटातील आतडी सबळ बनवून पचन शक्ती वाढते. पोटात काही विजातीय गेल्याचा संशय असल्यासही प्रसंगानुसार ते विजातीय बाहेर काढण्याची उपरती होते. 
(सुचना:- अनुभवी व्यक्तिच्या मार्गदर्शना शिवाय करू नका. प्रत्यक्ष माहिती घ्या)

बस्ती क्रिया
वरील सर्व क्रियांचे नंतर बस्तीचा अभ्यास सांगितला आहे. बस्ती ३ प्रकारची केली जाते. १) बास बस्ती,  २) महाबस्ती ३) वायू बस्ती
सर्वसाधारण अभ्यासा साठी ‘बास बस्ती' चा अभ्यास केला जातो. बाकी बस्ती जरा कठीण आहेत‌. बस्तीचे स्थान मूलाधाराच्या जवळ आहे. त्याला साफ करण्याच्या क्रियेला ‘बस्ती’ म्हणतात.
विधी:- 
  1. बास जल बस्ती:- एक ६ इंचाची बांबूची चिकणी नळी घेऊन तिला स्निग्ध पदार्थ लावून ४ नळीचा गुदद्वारात प्रवेश करणे व नौली कर्माचा साहाय्याने खाली भांड्यात ठेवलेले पाणी त्या नळीने गुरुद्वारातून आत पोटात  ओढणे व ताबडतोब बाहेर काढून नौली कर्म करून पोटातील पाणी गुद द्वारा वाटे बाहेर टाकणे त्यांचे नाव बासजलबस्ती' असे आहे.
  2. महा बस्ती:- कमरेवर असलेल्या पाण्यात उभे राहून निव्वळ गुथद्वारे पाणि आंत ओढणे व सोडणे याला ‘महाबस्ती’ असे म्हटले आहे. ही बस्ती नदीत, तलावात केली जाते.
  1. वायुबस्ती:- जमिनीवर पाठीवर पडून दोन्ही हात पाय पोटावर आवळून गुथद्वारे बाहेरील वायु आंत ओढणे, सोडणे (अश्विनी मुद्रा करणे) याला “वायूबस्ती’  असे म्हटले आहे. हीच क्रिया पश्चिमोत्तानात बसूनही करता येते. सर्वसाधारणपणे काही अभ्यासू मंडळी बासजलबस्ती चा अभ्यास करतात. बाकी इतर जलबस्तीमुळे अज्ञानवश धोका पत्करावा लागतो म्हणून सावधान‌. काही विशेष लाभ शास्त्राने सांगितले आहेत ते असे-
‘गुल्मप्लीहोदरं चापि वात-पित्त-कफोद्भवा: || 
बस्ती कर्म प्रभादेन क्षीयंते सकलामया:'|| ||मठ २/२७||
अशा रीतीने बस्ती कर्म केल्याने, गुल्म विकार जलोदर व वात-पित्त-कफ यांनी निर्माण होणारे इतरत्र विकार संपूर्ण नष्ट होतात. शरीर हलके होते‌. मनुष्य वेगवान बनतो.
          
त्राटक’
 मानवाचे मनाचे विकार दूर करण्यासाठी योगातील शुद्धीकर्मात एक  महत्त्वाचे विशेष कर्म म्हणून अभ्यासावे लागते. ज्यामुळे या विधीने चित्ताचे एकाग्रतेपासून समाधीपर्यंतचा अभ्यास करता येतो.
मन या विषयात धर्मग्रंथात आपण कितीतरी आश्चर्यकारक अशी कथने वाचतो. संसारातील सर्व गोष्टींचा संबंध मनाशी असल्यामुळे त्या मनाला मानव कधी कधी संकटकाळी, निराशेच्या वेळी, पापी, चंचल, अधम अशा शब्दांनी संभोधतो. माणसाच्या सुखाला आणि दुःखाला कारण आहे मध.  म्हणूनच शास्त्राने केलेली मनाची व्याख्या सर्वांना पाठ आहे.
‘मन एवं मनुष्यांणा | कारण बंध मोक्ष यो:' ||
मानवाला प्रगतीच्या शिखरावर नेणारे आणि मुक्तीचे साधन मनच आहे. मनाची वृत्ती ज्यावेळी विषयभोगा कडे वळते त्याचवेळी ते पतनाला व दुःखाला कारण होते. पण जर मनाची गती उच्च विषय, उत्तम गुणांना संपादन करण्याकडे प्रवृत्ती होते त्यावेळी बुद्धी, ज्ञान, कर्म, आणि मुक्तिला ते  एक साधन म्हणून बनते. मनच भक्ति, ज्ञान, कर्म, मुक्ती, आत्मदर्शन (प्रभू दर्शन)  ह्याचे साधन आहे. याकरिता अध्यात्ममार्गात मनाला वश करण्या साठी, त्याला नियंत्रित करण्या साठी, उपयोगात आणण्यासाठी, “त्राटक” एक अती शक्तीशाली साधन आहे‌‌.
आता या महत्त्वपूर्ण “त्राटक” या विषयाचा या ठिकाणी आपण शोधनकर्माच्या दृष्टीनेच विचार करावयाचा आहे. म्हणजे “त्राटका”ने दृष्टीदोष व त्याबरोबरच त्यात संबंधित असे सूक्ष्म वाटणारे काही विकार यांचा नाश करायचा आहे. त्राटक हा विषय योगीजनांनी अतिमहत्त्वाचा व गुप्त असा मानला आहे. कारण त्याचे अध्यात्मिक महत्त्व फार मोठे आहे. सामान्य माणसास  त्याचा आरोग्याच्या दृष्टीने अभ्यास करावयाचा म्हटला तरी निराळ्या ग्रंथात व पुस्तकात ‘त्राटका’ बद्दल केलेल्या मार्गदर्शनाचा योग्य बोध होईलच असे सांगता येणार नाही. म्हणून सहज व सोपी अशी ही पद्धत त्याच्याच या ठिकाणी उल्लेख केलेला आहे 'त्राटका'ची शास्त्रीय ओळख व त्यांचे सुपरिणाम खालील सिद्धांता वरून स्पष्ट आहेत‌.
निरीक्षेत्रिश्चलदृशा सूक्ष्मलक्ष्यं समाहित: || 
अश्रूसंपातपर्यंतमाचार्यैस्त्राटकं स्मृतम्|| ||मठ.२/३१||
अर्थातच सिद्धासन, पद्मासन अगर सहज सुखासनात बसून एखाद्या सूक्ष्म वस्तूवर म्हणजेच ज्योती, बिंदू, आरशात आपल्या भूमध्य वर  डोळे उघडे ठेवून डोळ्यातून पाणी आले तरी टक लावून पाहण्याचा प्रयत्न करणे यास “त्राटक” असे म्हणतात.
मोचनं नेत्ररोगांणां तंद्रादिनां कपाटकम्||  
यत्नतस्त्रांटकं गोप्य यथा हाटक पेटकम्|| ||हठ.२/३२//
या श्लोकात त्याचे सुपरिणाम सांगितलेले आहे. याप्रमाणे त्राटक केल्याने ते नेत्ररोग नाशक असून तपोगुण आणि आळसाचा नाश करणारे साधन आहे. त्याला  सुवर्णाच्या पेटी प्रमाणे गुप्त ठेवले पाहिजे. घेरंड संहितेत याविषयी म्हटलेले आहे.
'एवमभ्यासयोगेन शाम्भवी जायचे ध्रुवम्||
नेत्रदोषाविनश्न्ति दिव्यदृष्टी: प्रजायते || || घे.१/५४||
“त्राटक” केल्याने नेत्र दोषाचे निवारण होऊन “शांभवी” भृकुटीमध्ये ध्यानाची अवस्था प्राप्त होते. व दिव्यदृष्टीचा लाभ होतो. त्राटकाच्या साधारण ३ पद्धती आहेत. १) आंतर त्राटक २) मध्य त्राटक ३) बाह्य त्राटक. 
  1. आंतर त्राटक:-
हे त्राटक करतांना डोळे बंद करुन ‘नाभि प्रदेश’ हृदय, भृकुटीचा मध्य वगैरे आतील इंद्रियावर आतून बघण्याची (अंतर्मुख होऊन नुसत्या कल्पनेने पहात राहण्याची) वृत्ती वाढविणे यास ‘आंतर त्राटक' असे म्हणतात.
  1. मध्य त्राटक:- डोळे उघडे ठेवून समोर ठेवलेल्या कागदावरील काळ्या बिंदूवर, एखादी दगडी लहान वस्तूवर, अक्षरावर, झाडांच्या हिरव्या लहान पानावर,  ज्योती वर टक लावून सतत पाहण्याचा अभ्यास करणे यास ‘मध्य त्राटक' म्हणतात.
  2. बाह्य त्राटक:- डोळे उघडे ठेवून लांब अंतरावरील म्हणजे आकाशा तील तारे, चंद्र व सूर्य उदयास्त, लांब पर्वतावरील अगर समुद्रातील दृश्यावर दृष्टी स्थिर करून पाहणे याला ‘बाह्य त्राटक' म्हणावे.
वरील प्रमाणे निरनिराळ्या वस्तू वर केलेल्या त्या त्राटकाचे वेगळे लाभ पण सांगितले आहेत. कोणत्या वस्तूवरील त्राटक कोणत्या व्यक्तीने किती वेळ, केव्हा व कसे करावे याबाबत साधकाने तारतम्य वापरले पाहिजे. सर्वाच गोष्टी लिखाणातून स्पष्ट होणे  शक्य नाही. म्हणून एखाद्या हट्टी साधकास त्यापासून लाभ होण्याऐवजी फार मोठे नुकसान सहन करावे लागते. उदाहरणार्थ  सूर्यावर त्राटक करायचे म्हटले म्हणजे सूर्योदय होत असतानाच काही सेकंदात पासून काही मिनिटेच ते करून नंतर लगेच थंड पाण्याने ‘नेत्रस्नान’ केले पाहिजे. याप्रमाणे नियम लक्षात घेता जर सूर्यावर जास्त वेळ त्राटक केले तर विशेष सिद्धी प्राप्त होईल या खुळ्या कल्पनेने साधक आपल्याच कल्पनेने कोणत्याही वेळी सूर्यावर त्राटक करून आपली दृष्टी गमावून बसले आहेत. तर कोणास मस्तक शूळचा  विकार उद्भवलेला आहे.  यातून आपणास एवढ्याच बोध घ्यावयाचा आहे की, त्राटकाचा आरोग्यापुरता फायदा  साधण्या साठी सूर्यादी कठीण दृश्यावर करण्याचा प्रयत्न न करता सोप्या दृश्यावर करावा.
मध्य त्राटकात  दिलेल्या विवेचनात अनुसरून खालील प्रमाणे त्राटकाची रीत प्रत्येकाने अभ्यासल्यास शंका व भीतीचे कारण राहणार नाही व कोणासही ५-२० मिनिटापर्यंत या त्राटकाचा आनंद लुटता येईल. या त्राटकाचे नाव आहे “ज्योती त्राटक“

“ज्य़ोती त्राटक”
स्नानादी कर्म आटोपल्यानंतर देवघरात अगर आपल्या बैठकीत जसे शक्य असेल त्याप्रमाणे तुपाचे अगर कापूर मिश्रित तिळाच्या तेलाचे निरांजन लावून तेथून ४-५ फुटाच्या अंतरावर आसनस्थ व्हावे. निरंजन ठेवण्याच्या जागेची उंची आपल्या डोळ्यासमोर “निरांजनाची ज्योत” येईल अशी असावी त्यासाठी तेवढ्या उंचीचे एक लाकडी स्टँड बनवून घेतल्यास चांगले. त्राटकात बसते वेळी एक थंड पाण्याची वाटी बाजूला भरून ठेवावी. त्राटक करावयाच्या जागी थोड्या वेळेपुरता अंधार असल्यास बरा वाऱ्याचा झोत सहसा निरंजना वर येऊ नये. ज्योत स्थिर व साधारण अर्धा इंच असावी. प्रसंगावर निरंजनाच्या अभावी मेणबत्तीही उपयोगात आणली तरी चालेल.
  आसनात बसल्यानंतर दोन्ही हातांची ओंजळ करून डाव्या हाताच्या तळव्यात उजव्या हाताची पाठ ठेवून आपल्या ओटीपोटाच्या पुढील बाजूस स्वाधिष्ठानाजवळ ते हात धरावेत. अगर दोन्ही मांड्यावर ध्यान मुद्रेत ठेवावे. नंतर ‘ज्योती' वर लक्ष्य केंद्रित करावे. सर्व विचारांना टाकून बाह्य दृश्यांना विसरण्याचा प्रयत्न करीत ‘ज्योती’ हे एकच लक्ष असावे. ज्योतीवर त्राटक करताना एकच भावना करावी की, डोळ्याचे ज्ञानतंतू बलवान होत आहेत. नेत्र प्रभावशाली व आकर्षक होत आहेत. जसजसे ज्योतीकडे पाहण्याचा प्रयत्न होईल तसतसे निरनिराळी दृश्यै आपल्यासमोर येतील. सिनेमाच्या फिल्म प्रमाणे एकामागून एक अशी मालिका लागेल. अभ्यास जसजसा दृढ होईल तसतशी ती दृष्ये कमी होत आहेत असा अनुभव येईल. नंतर आपणास ज्योतीशिवाय काहीही दिसणार नाही व याच वेळी साधकास नाटकाचा खरा अनुभवास येतो‌.२ मी‌. पासून ते १५ मी. पर्यंत अभ्यास साधावा. डोळ्यास पाणी आले तरी डोळे सहज बंद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. पाणी आलेल्या अवस्थेतही डोळे न मिटता ज्योतीकडे पहात राहणे, नंतर थांबणे असह्य झाल्यास डोळे मिटून जितका वेळ आपण ज्योती कडे पाहत होतो, साधारण तितका वेळ डोळे बंद करून तेच ज्योतीचे दृश्य बघायचे आहे. नंतर दोन्ही डोळे उघडावयाचे तत्पश्चात एक डोळा त्या बाजूच्या हाताच्या तळव्याने बंद करून दुसऱ्या डोळ्यावर त्या बाजूकडील हाताने जवळ ठेवलेल्या वाटीतील पाणी घेऊन चार बोटांनी अगर पाण्यात भिजवलेला रुमाल घेऊन त्याने डोळ्याकडून नाकाकडे वारंवार फिरवावे. रुमाल फिरविते वेळी तो डोळा बंद राहील. हात डोळ्यांच्या कोपऱ्यात गेल्यावर डोळा उघडून त्याच उघड्या डोळ्याने ज्योतीकडे बघत रहावे तोपर्यंत हात कानाकडे गेलेला असेल. १०-१५ वेळा अशा तऱ्हेने पाणी फिरवल्यावर हाताने बंद केलेला डोळा उघडावा व पाणी फिरवलेल्या डोळा त्या बाजूच्या हाताच्या तळव्याने बंद करून उघडलेला डोळ्यावर वरील प्रमाणेच १०-१५ वेळा पाणी फिरवावे. दोन्ही डोळ्यावर अशा तऱ्हेने पाणी फिरवून झाल्यावर डोळ्याचे पाणी पुसून त्राटक बंद करावे‌. वेळच्या व साधनाच्या अभावी ज्योती त्राटक न जमल्यास अगरबत्तीच्या जळत्या भागावर अगर आरशात आपल्या भुवयांच्या मध्यभागी आज्ञाचक्रावर पाहूनही वरील प्रमाणे त्राटक करता येईल‌. या वेळी दोन ते अडीच फुटावरून त्राटक करावे. शक्यतो ‘ज्योती त्राटका‘ ने लाभ घ्यावा. 
(सूचना:- त्राटक करणाऱ्यांनी जलनेती चा अभ्यास केलाच पाहिजे.)

त्राटकाचे लाभ
आलस्याचा नाश होऊन मन स्थिर होते., शारीरिक व मानसिक उत्साह वाढतो‌. नेत्रदोष नाहीसे होतात. दृष्टी पवित्र व तेज होते. श्‍वासाची गती मंदावते.ब चंचलता कमी होते. त्राटक करणारा साधक आपले काम व क्रोध यांना बऱ्याच अंशी ‘अंकुश’ लावू शकतो. आंतरिक बलाची सिद्धी होते‌. योगात कुंभकांनी जो लाभ साधला जातो तो अर्थातच 'त्राटकां’ ने मिळतो. भावना आवरण्याची शक्ती प्राप्त होते‌. चित्ताची एकाग्रता स्वभाविक झाल्याने दृष्टी स्थिर होते. (पापण्यांची उघडझाप कमी होते.)
प्रौढ बुद्धीच्या विद्यार्थ्यांना त्राटकाचे कल्पनातीत लाभ होतात. त्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता, सुविचारांची प्रवृत्ती, निश्‍चयीवृत्ती, (संकल्पशक्ती) यांची गाढ वाढ होते. निद्रानाश व डोक्याचे किरकोळ विकारही जातात. वृत्तीत्तीची अंतर्मुखता वाढते. मानसिक विकार नाहीसे होतात.
रोगनिवारण, मारण, तारण, वशीकरण, शक्तीसंचारण वगैरे सर्व त्राटकाच्या  सिद्धीने होतात. डोळ्यांची ताकद वाढून नेत्रसंकेताने कोणा व्यक्तीलाही  आपल्याकडे बोलण्याची कला सिद्ध होते. त्राटकांने मिळवलेल्या काही “संमोहनशक्तीने” लोककल्याणाच्याही गोष्टी साध्य होतात.
 संमोहनशक्ती:- या शक्तीला Personal पर्सनल अथवा एनिमल मॅग्नेटिझम (Animal Magnetism) (प्राण्यांची विद्युत) आणि फारशीमध्ये ‘शक्सी मिकनातीस' वा 'कशीश रुहानी' असे म्हणतात. ही शक्ती साधनेने जो वाढवू शकतो ती व्यक्ती प्रभावी, उत्साही, तेजस्वी, आत्मविश्वासी, कार्यकुशल, आशावादी अशा प्रकारची होते. मनुष्य आपल्याच विचारांनी बनलेला आहे. जसे ‘श्रद्धामयो$यं पुरूषो तो सच्छ्रध्द: स एव स:'| 
 ज्याचे जसे विचार तो तसाच बघतो. म्हणूनच वरील कमानी आरोग्याची भावना बाळगून 
ॐ आनंदम्, ॐ आरोग्यम् या जपाद्वारे रोगनिवारणाचा अनुभव होतो. या संमोहनशक्तीचे स्थान मस्तक असल्याने त्याचा प्रभाव साधकाचे चेहऱ्यावर नाक, डोळे, तोंड, हात, हाताची बोटे, यावर येतो. ही शक्ती दृष्टी व हाताच्या बोटांची अग्रे यातून बाहेर पडत असते. या शक्तीला ओजस आणि तेजस अशा संज्ञा आहेत. त्याला AURA आणि फारशीमध्ये जलाल आणि नुर असे म्हणतात. याला विद्युत प्रवाह आणि प्राणतत्व असेही म्हणतात. 
संमोहनशक्ति द्वारे प्रयोग:- संमोहनशक्तीला साधनेद्वारा वाढवून डोळ्याने त्राटकाद्वारा,  नाकाने श्वासामार्गे, तोंडाने फुंकर घालून, हाताने मार्जन (दीर्घ व लघु) करून, ज्याला इंग्रजीत पासेस (Passas) असे म्हणतात. मेंदूला दृढतापूर्वक सूचना (Suggestions) देऊन, शारीरिक व मानसिक रोगांची निवृत्ती केली जाते. ही विद्या भारतात रामायान कालापासून चालत आलेली आहे. याचे काही सिद्धांत शास्त्रात आहेत‌.
      पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये याचा आधुनिक अविष्कार मेस्मेरिझम (Masmerism) आणि हिप्नॉटिझम (Hipnotism) या नावाने जाहीर आहेच. ती शक्ती प्राप्त केल्यानंतर तिचा सदुपयोग व दुरुपयोग होऊ शकतो. पण अशा रीतीने मिळवलेली ‘आत्मशक्ति’ हीन गोष्टीकडे खर्च करणाऱ्या व्यक्तीला अध:पतनाच्या मार्गाकडे नेत असते. म्हणूनच अनेक सिद्धीवाले बाबा रसातळाला गेले. सिध्दिच्यापाठी लागणारे दुःखाच्या भोवऱ्यात गवसतातच.  
साधकाने ही ईश्वरीशक्ति ‘जनकल्याणार्थ’ व मानवतेच्या विकासासाठी  लावल पाहिजे‌. असा मनुष्य  पूजनीय व वंदनीय बनतो.





1 comment:

  1. iron titanium | TITanium-Arts
    Iron Titanium-Arts.com is the largest supplier titanium cerakote of quality materials to babyliss pro titanium straightener the trekz titanium pairing world's leading titanium tubing manufacturers mens titanium earrings of iron-iron-toned stainless steel in

    ReplyDelete

पुसद जि. यवतमाळ येथे योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा वर मार्गदर्शन*

योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा  वर मार्गदर्शन                             मंगळवार दि.22/11/2023 ला दुपारी  गांधीनगर, पत्रे ल...